Blogger Template by Blogcrowds.

विहार मानू नकोस, आहे ठरीव चौकट, ठरीव वावर

कुणीतरी वेगळाच मांडून चालवी सोंगट्या पटावर



कुठून पडले जुन्या स्मृतींचे गुलाबपाणी तनामनावर

उगाच कोमेजल्या क्षणांना खलून शिंपण कलेवरावर 



गळून गेलीत सर्व पाने, जळून गेलेत सर्व मोहर

लतारुपी बांडगूळ पण आजही तरारे तरूवरावर



अधीर आहे तुझ्या मिठीच्या उबेत सर्वस्व जाळण्या मी

अखेरची मुक्ति दे मला तू पडून, विद्युल्लते, शिरावर



अता तरी हा उठेल का ह्या मनावरीचा निराश वेढा

पराभवाशी समेट केला, करून झाल्या सह्या तहावर 



सबूर, केव्हातरी तुझ्याही कुणीतरी गुणगुणेल ओळी

म्हणेल, "होता बरा कवी हा, नसेल ग़ालिब, नसेल खावर"

0 Comments:

Post a Comment



Newer Post Older Post Home