रात्र पडता तेज ज्याचे लुप्त होते
लोक असल्या भास्कराचे भक्त होते
देवळाबाहेर रांगा लांब होत्या
देव गाभार्यातले निद्रिस्त होते
फायदा-नुकसान काटेकोर ज्यांचे
पाप-पुण्याचेच खाते व्यस्त होते
एवढ्या उच्चारवाने घोषणा का ?
लागले डोलू कुणाचे तक्त होते ?
वेचले, मग फेकले, तुडवून गेली
भासले माझे हृदय प्राजक्त होते
अर्थ काही वेगळा होता स्मिताचा
वेदनेने नेत्र ओले लिप्त होते
का विटाळू मांडुनी शब्दांत त्याला
अंतरी जे आजवर अव्यक्त होते ?
गीत-गझला दोन घटकांचेच रंजन
दीपिका होते अमर, वा सूक्त होते
सोसतो गर्भारशीसम रोज वेणा
काव्यसंभव का कधी परहस्त होते ?
काय सृजनावाचुनी अडले कुणाचे
प्रजननाने जर अहम् अभिव्यक्त होते ?
एक तर रद्दीत जाते काव्य सारे
फार धगधगलेच तर ते जप्त होते
कल्पना घाली मिठी काव्यास ऐसी
अर्थ शब्दांवर जणू अनुरक्त होते
काव्यमय शृंगार की क्रांती-तुतारी ?
चेतले जे आजवर संन्यस्त होते !
अनुभवांती वाटते, चुकलेच माझे
खूप लिहिले, मात्र ते बेशिस्त होते
Labels: ghazal, Marathi ghazal, गझल, मराठी गझल
कधी कधी शब्दांनाही मोकळे असू द्या
उगाच बेड्या चरणांना घालता कशाला ?
नकोत छंदांच्या गाठी, मोकळे असू द्या
पहा किती काव्याचे शेवाळले सरोवर
खळाळती ठेवा वाणी; मोकळे असू द्या
दिसून यावा सर्वांना चेहरा कवीचा
असे कवन आरस्पानी, मोकळे असू द्या
असो मुखी यवनी वा गीर्वाण शब्दगंगा
हृदय मराठीच्यासाठी मोकळे असू द्या
Labels: कविता
ते कुणाचे शब्द होते? ते कुणाचे सूर होते?
अंतरी वस्तीस होते, अन् तरीही दूर होते
हे कसे वात्सल्य ज्याचा कोरडा असतो उमाळा?
राहिले पान्हावण्याचे ते अभागी ऊर होते
मी प्रवाहाच्या बरोबर वाहण्याचे काम केले
पैलतीरी पोचण्याइतके कुठे मगदूर होते?
लक्ष योनींचा पसारा, ह्या फुकाच्या येरझारा
जन्म-मरणाचीच चिंता, मोक्ष मिळणे दूर होते
’भृंग’, नाभीकमळ शोधू , ती मिठी असते चिरंतन
बाप, आई, मित्र, पत्नी; सर्व क्षणभंगूर होते...
Labels: ghazal, Marathi ghazal, गझल, मराठी गझल
मोहाची फुले, मोहाचे घोट
जीवनात ओतप्रोत
पण आम्ही
हुंगणार नाही, पिणार नाही
मचूळ पाण्याशिवाय काही
कारण आम्हाला मिळाले आहेत
नेभळट, पांढरपेशे संस्कार; अन्
"साधी राहणी,उच्च विचारसरणी" सारख्या सुभाषितांची अफू
तिचे व्यसन जडले की मागून येतात
"अंथरूण पाहून पाय पसरावे",
"बिकट वाट वहिवाट नसावी"
ह्या तिच्या बहिणी
ज्यांनी नासवल्या मध्यमवर्गियांच्या कित्येक पिढ्या
"समाजाची धुरा तुमच्यावर आहे" ही लोणकढी ठोकून
जगण्याच्या आनंदास पाप ठरवले
आणि दारिद्र्यास लावल्या उदात्ततेच्या झालरी
नीतिमत्तेच्या आनुवंशिक क्षयरोगाला कवटाळून बसतो आम्ही
छोट्या छोट्या लबाड्या करतानाही
(कारण दरोडा घालण्याची हिंमत नाही)
अजून किती काळ बसणार आहोत कुरतडत
न झेपणार्या नैतिकतेचे पाश,
त्यांचेच गोडवे गात ?
Labels: कविता बॉंबस्फोट
असे भान हरपून गेले तिच्या दर्शनाने
मला स्वप्ननगरीत नेले तिच्या दर्शनाने
तिला पाहिले, भासले फूल झाले कळीचे
बहरले मनी लाख झेले तिच्या दर्शनाने
तिला छेडणार्या कवडशांस का दोष द्यावा ?
शशी-सूर्यही मातलेले तिच्या दर्शनाने
प्रतीक्षेत होती जरी शांभवी सोबतीला
परी लाजले मद्यपेले तिच्या दर्शनाने
गुन्हा प्रीतिचा मान्य आहे मला सर्वथा पण
प्रमादास प्रवृत्त केले तिच्या दर्शनाने
मिलिंदा, पहा आजही वाचली जात गीता
असे विश्व भारावलेले तिच्या दर्शनाने
Labels: Marathi ghazal, गझल, मराठी गझल
समजुनी बसलाय ऐरण माणसाला
देव भेटे होउनी घण माणसाला
रोजची आहे लढाई भाकरीची
रोजची पोटार्थ वणवण माणसाला
जू असे मानेवरी, ओझे शिरावर
वेतनाचे शुष्क वैरण माणसाला
स्वच्छ ठेवा, स्वच्छ ते सांगेल सारे
आपले मन हेच दर्पण माणसाला
ब्रह्मकमळासारखी त्याची प्रतीक्षा
सर्जनाचे मोजके क्षण माणसाला
अस्वलाला नाचवी दरवेश जैसा
दैव बांधे चाळ-पैंजण माणसाला
Labels: Marathi ghazal, गझल, मराठी गझल
किती शब्द गिरवून पाहिले, परंतु कोरी पाटी
बोटे झिजली, मीही झिजलो; कशास ? कोणासाठी ?
घडण मनाची एकलकोंडी, हृदयी भावविवशता
एकरूप कवितेशी करते, उपरा लोकांसाठी
अनुभूतीचे असे दंश की सर्पांनी लाजावे
रक्त कमी, धमन्यांतून झाली हलाहलाची दाटी
कटूपणाला पिळवटून ये कटूच रसनिष्पत्ती
कसा गोडवा यावा शब्दांतून पेरण्यासाठी ?
मनातल्या गाळाचा निचरा कवितेमधुनी केला
भागिरथीसाठी कवनाच्या किती उपसली माती
किती समीधा ओळींच्या अर्पून पेटता ठेवू ?
हविर्भाग जगण्याचा देतो लेखनयज्ञासाठी...
Labels: कविता
खोलवर सार्या मनांच्या गाडली आहे तृषा
मात्र वसने सोवळ्याची नेसली आहे तृषा
'लोककल्याणार्थ' काया झिजवणारे पाहिले
त्याच गरजा 'सज्जनांच्या', 'त्यातली' आहे तृषा
हो, दिला फेसाळ प्याला, मात्र डोळे चुकविले
हाय, साकीने न माझी जाणली आहे तृषा
उष्ण श्वासांनी कुणाच्या पेटवावी पुनरपी
थंड नजरेने तुझ्या जी गोठली आहे तृषा ?
काल मधुशालेत बसलो पंडितासोबत जरा
लागली परमेश्वराची; बाटली आहे तृषा
वैष्णवाला नेत आहे आज मधुशालेत मी
त्यासही सोमेश्वराची लागली आहे तृषा
कुंकवाचा घ्या करंडा अन् भरा मळवट तिचा
साथ ती आजन्म देते, सावली आहे तृषा
जीवनाच्या दोन घोटांहून नव्हते मागणे
लीलया त्यांच्यातही सामावली आहे तृषा
वारुणी मी जीवनाची आणली होती किती ?
संपली ती, संपलो मी, संपली आहे तृषा
द्याल अग्नी मज जिथे, बांधा तिथे मंदिर तिचे
माझियासंगे सती ही चालली आहे तृषा
एक वाट रेंगाळणारी
दारावरून जाते
घाईत असणाऱ्या माणसांच्या
वर्षानुवर्षे
चावडीपासून चौकापर्यंत
गोष्ट फार जुनी नाही
तेव्हा चावडी फुललेली असायची
एकमेकांच्यात रमणाऱ्या माणसांनी
त्यांच्या सुखदुःखाच्या गप्पांची साक्षीदार
आणि वाट दिवसातून दोनदाच गजबजायची
पोटार्थी प्रवासाने
सकाळची ताजी, कर्तव्यदक्ष पावले
संध्याकाळची श्रांत पण उत्सुक...
वाट जुनी
तिला सोसत नाही
ही चोवीस तासांची वर्दळ
कळत नाहीत
जगाच्या दुसऱ्या टोकाच्या घड्याळावर धावणारी माणसे
तिच्या विश्वाची व्याप्ती
वर्षानुवर्षे
चावडीपासून चौकापर्यंत...
आता चावडी निर्जन, ओस
माणसे व्हर्च्युअल कोशातून 'मित्र विनंती' करणारी.
व्हर्च्युअल जगाच्या व्हर्च्युअल मित्रांच्या
व्हर्च्युअल संख्येची व्हर्च्युअल स्पर्धा बघून
चावडी वाटेला विचारते,
"काय गं, पिंगमध्ये असतो का
खांद्यावरील हाताचा आश्वासक स्पर्श ?"
वाट हसते बोळके दाखवत, म्हणते,
"अगं, असं काय करतेस ?
आपण दोघी जन्माला आलो
तेव्हा असेच प्रश्न पडले होते ना
जंगलांना आणि गुहेंना..."
Labels: कविता
कधी हसणे, कधी रडणे जगी चुकले न कोणाला
कटू हे सत्य काही पण जगी पटले न कोणाला
किती उध्वस्त झाले जीवघेण्या क्रूर जगण्याने
लढा हा एकतर्फी अन् शरण चुकले न कोणाला
शिकवली रीत जगण्याची भिकारी पुण्यश्लोकांनी
इथे सद्वर्तनाने लाभले इमले न कोणाला
असे हव्यास कायेला किती कायेस भिडण्याचा
कसे दुःखास भोगावे कधी कळले न कोणाला
गुलाबी घालुनी कोडे निजाया गडकरी गेले
परी पोटातल्या आगीपुढे सुटले न कोणाला
असो बुद्धी, असो मेहनत, असो निष्ठा, असो अब्रू
कितीही काय कामाचे अगर विकले न कोणाला
कुणाला प्रश्न 'कोहम्?' हा कुठे हल्ली इथे पडतो
भुकेला तत्त्वज्ञानाचे धडे पुरले न कोणाला
करत उच्चारवाने घोषणा विक्षिप्त मुक्तीच्या
स्वतःला आजवर जे जे विकू शकले न कोणाला
किती सेवून गेले भृंग गोडी काव्यसुमनांची
तुझ्या शब्दांतले काटे कसे खुपले न कोणाला ?
Labels: गझल