मातली काळोखसत्ता, सूर्य सारे अस्त झाले
हिंद देशा; चोर, डाकू, ठग तुझे विश्वस्त झाले
भूक म्हणजे काय असते भारतीयांना समजले
ह्या इथे गाई-गुरांचे खाद्य देखिल फस्त झाले
देशसेवा, तत्त्व, निष्ठा, त्याग, संयम, प्रेम, शांती
ह्या महागाईत, बाकी, शब्द तितके स्वस्त झाले
बातम्या देण्यात रस उरला कुठे वार्ताहरांना?
ते दलालीवर नट्यांचे रोकडे मध्यस्त झाले
केस सीबीआयच्या हाती दिली न्यायाधिशांनी
"हुश्श"! मंत्री आणि बाबू पूर्णत: आश्वस्त झाले
बैसती बांधून डोळे सिंह ते सिंहासनावर
एक पायावर उभे बगळे जणू संन्यस्त झाले
Labels: ghazal, Marathi ghazal, गझल, मराठी गझल
0 Comments:
Subscribe to:
Post Comments (Atom)