Blogger Template by Blogcrowds.

सरले कवित्व तेव्हा भेटावयास आले 

जे शब्द पांगलेले, ते सांत्वनास आले 



चिरयौवना, चिरायू, स्वैरांगना तरी का 


स्मितहास्य अप्सरेच्या ओठी उदास आले ? 



वाटे हवेहवेसे ते सर्व लाभल्यावर 


का फोल संचिताचे मज प्रत्ययास आले ?



त्या सावळ्या तनूची सुरभि वसंतकाली 


बहरून गंध जैसे नीलोत्पलास आले 


 

आभार अक्षरांचे, ऋण शब्दसंचयाचे 

अवकाश कल्पनांचे बुजवावयास आले 



आजन्म अक्षरांची केल्यावरी मशागत 


कवितेत अर्थ काही अर्थांतरास आले

0 Comments:

Post a Comment



Newer Post Older Post Home