नाळ जगाशी जोडु न शकलो, बरेच झाले
माझे मीपण खोडु न शकलो, बरेच झाले ||धृ||
ओलाव्याचा अभाव होता नदीकिनारी
ओंजळ ओंजळ जीवन देई तळे विषारी
घाटावरल्या देवळात मी उभा भिकारी
अशा शिवारी रुजू न शकलो, बरेच झाले ||१||
दूर दूरवर औदुंबर आढळला नाही
अश्वत्थाचा परिचय काही घडला नाही
झपाटलेला पिंपळही सापडला नाही
निवडुंगाला त्यजू न शकलो, बरेच झाले ||२||
ऊन-पावसातून आजवर चालत होतो
स्वतः स्वतःची पायवाट मी घडवत होतो
मजल दरमजल माळरान ओलांडत होतो
हात कुणाचा धरू न शकलो, बरेच झाले ||३||
Labels: कविता
दृष्टीपथात आला तो तो शिकार झाला
आणिक तरी जिवावर जो तो उदार झाला
माझ्या तुझ्यात अलबत लेखी करार नव्हता
ओठास ओठ भिडले, मसुदा तयार झाला
माझ्याच आसवावर मी खार खात आहे
माझ्याहुनी तुझ्या जो पदरास प्यार झाला
विश्वासघात केला की फक्त चूक होती?
का नेमक्याच वेळी संयम चुकार झाला?
वाटायचे मला की जनरीत हीच आहे
म्हणतात लोक; काही भलता प्रकार झाला...
Labels: ghazal, Marathi ghazal, गझल, मराठी गझल
Subscribe to:
Posts (Atom)

