Blogger Template by Blogcrowds.

घाट

टळून गेली दुपार तरिही अजून का सांज येत नाही
अधीर हा सूर्य पेटलेला, अजून का चांद येत नाही

तुझ्या कृपेचे अनेक सागर हसून मी घोट घोट प्यालो
अजून जीवन तसेच अळणी, अजून का स्वाद येत नाही

चिणून भिंतीत हुंदक्यांना सजेल खिडकी मुक्या फुलांनी
भकास रात्रीत पैंजणांचा उगाच आकांत येत नाही

जसे जसे जीर्ण होत गेले सुडौल मंदिर, तरूण मूर्ती
चिरा चिरा सैल होत गेला, अता कुणी भाट येत नाही

विषण्ण रस्त्यात गाठ पडली न डोंगरांची न टेकड्यांची
सपाट वाटेत जीवनाच्या मनातले घाट येत नाही

लपेटलेली धुक्यात येते पहाट हल्ली उदासवाणी
सकाळच्या का समेवरी ती, सखे, जुनी दाद येत नाही ?

प्रयाग शोधून सापडेना, मिलिंद, वाहू जगी समांतर
अजून कानात सागराची कशी परी गाज येत नाही ?

1 Comment:

  1. धोंडोपंत said...
    अप्रतिम गज़ल...नेहमीप्रमाणेच.

    सुंदर...सर्व शेर आवडले

    अगस्ती

Post a Comment



Newer Post Older Post Home