Blogger Template by Blogcrowds

Friday, May 23, 2008

तोल

काजळकाळ्या नयनि असावे, अधरांच्या गोडीत असावे

रहस्य माझ्या पराभवाचे मोहक त्या जिवणीत असावे


हातांमध्ये हात असावे, ओठांवरती गीत असावे

एकांताच्या ताल-सुरांनी नटलेले संगीत असावे


कुठल्या दूताच्या हाती मी निरोप धाडू समजत नाही

पाळत इतकी तिच्यावरी की मेघाला अडवीत असावे


रीत जगाची मोडत असता, रिवाज सारे तोडत असता

धीट असावे थोडे आपण, थोडेसे भयभीत असावे


तोल कशाने, मिलिंद, हल्ली दोघांचाही जातो आहे ?

मद्याचे गुणधर्म कदाचित विरघळले प्रीतीत असावे

Monday, May 19, 2008

पीस

छेडता मी गीत, मोहरलीस तू
शब्द फुंकर, भाव वारा, पीस तू

अर्थ छेडू लागले शब्दांतले
होउनी मग तार थरथरलीस तू

धुंद झालो ऐकुनी आरोह मी
का समेवर येत अवघडलीस तू?

विस्कटाया लागली माझी घडी
ह्या घडीसाठीच ना सजलीस तू?

शब्द प्रेमाचा कसा मोडेन मी?
राहिली आहेस त्या ओलीस तू!

मंद हास्याचा उखाणा कूट वा
गूढ तू कोडे, कुणा सुटलीस तू?

मी तुझ्यावाचून होतो पांगळा
पूर्तता, अर्धांगिनी, ठरलीस तू...

Friday, May 09, 2008

गझल

ना कुणी कल्याणकर्ते शेष आता
राज्यकर्ते लांडगे वा मेष आता

शेत सुकले, कर्ज थकले, मॉल सजले
केव्हढा बदलून गेला देश आता

बैल जो बसला, पुन्हा उठलाच नाही
वैरणीचा राहिला ना लेश आता

आदिवासींनो, नका राहू उपाशी
शासनाने काढला आदेश आता

एकही नाही कुपोषित मूल येथे
पोटभर मिळतात अध्यादेश आता

राहिली लोकांस ना ऊर्मी लढ्याची
राहिला नाही जुना आवेश आता

नाग बसले व्यापुनी सहकारयमुना
कालिया सारे, कुणी ना शेष आता

सांगली, बारामती, लातूर, करविर
यापुढे उरला नसे का देश आता ?

Wednesday, May 07, 2008

कधी

"हो" कधी, "नाही" कधी अन्‌ "कदाचित" ही कधी
काय समजावे कुणी ? ठाम असते ती कधी ?

रोज माझा प्रश्न अन्‌ रोज चतुराई तिची
टाळते हसुनी कधी, मागते अवधी कधी

हा निरागस चेहरा, हास्य हे मनमोकळे
वाटते अल्लड कधी, वाटते खेळी कधी

बांध पाटाला कधी जीवनाच्या घालते
आणि होते त्यावरी कागदी होडी कधी

ती कधी माझ्यामध्ये खोल दडुनी बैसते
फेर धरुनी नाचते जाणिवांभवती कधी

ती जरी नसली तरी श्वास माझा चालतो
येत नाही त्यास पण गंध कस्तूरी कधी

अंथरावी लागते वेदना हृदयातली
चालुनी येते गझल, 'भृंग', का सहजी कधी ?

Friday, May 02, 2008

यातना


डोळ्यातली तुझ्या ना मी वेदना समजलो
प्रेमास ना समजलो, नाही मना समजलो

मस्तीत जीवनाच्या, धुंदीत यौवनाच्या
तृप्तीस इंद्रियांच्या संवेदना समजलो

झाले असह्य जेव्हा, मिटलेस फक्त डोळे
मिटण्यासही तुझ्या त्या मी वासना समजलो

माझेच नाव व्यापी तव पुस्तकास अवघ्या
तळटीप वा तुला मी प्रस्तावना समजलो

समजून हेम धरले छातीस हीन कथला
लक्ष्मीस मी गुणांच्या निष्कांचना समजलो

कळले न आतड्यांचे तुटणे तुझ्या कधीही
शब्दांस काळजीच्या निर्भर्त्सना समजलो

धरती क्षमाशिला अन्‌ अपराध पावसाचे
परमेश्वरी कृपेची ही योजना समजलो

सरला वसंत, उरले काटे उरात बाकी
तेव्हा फुलारण्याची मी यातना समजलो...

Thursday, April 24, 2008

निरोप

थांब जराशी, चंद्र नभी मावळला नाही
प्राजक्ताने श्वेत सडा अंथरला नाही...

कुठे संपला झिम्मा ताऱ्यांचा आकाशी ?
रंग उषेने व्योमावर शिंपडला नाही...

रातकिड्यांनी कुठे छेडली, सखे, भैरवी ?
सूर विहंगांचा कानावर पडला नाही...

निशिगंधाचा अजून येतो मादक दरवळ
गुलाब, जाई, जुई, मोगरा फुलला नाही...

अजून जागा झाला नाही पहाटवारा
दवस्पर्शाने देह कळीचा खुलला नाही...

किती बोललो डोळ्यांनी, ओठां-स्पर्शांनी
शब्द निरोपाचा काही सापडला नाही...

Saturday, April 19, 2008

कुजबुज

मी डाव टाकला की तू फेकलेस जाळे ?
खेळात उभयतांची जिंकून मात झाली

आयुष्यरखरखाटा आच्छादलेस ऐसे
मध्यान्हिच्या उन्हाची पौर्णीम रात झाली

खुलली सुवर्णकांती अजुनी मदालसेची
हळदीत नाहली अन् सिंदूरस्नात झाली

जाता जवळ जरासा, रोमांचली नवोढा
धडधड अधीर, नूतन नवख्या उरात झाली

हाकी अरूण निर्दय वेगात रथ असा का
आरूढ ज्यावरी ही अरसिक प्रभात झाली ?

फुलुनी खुणावणारी होती फुलंही दोषी
अपकीर्ति पण अलीची रानावनात झाली

करता मिलिंद गुंजन अलगद मधास लुटतो
कुजबुज अशी फुलांची आपापसात झाली

Older Posts