Blogger Template by Blogcrowds.

कळू लागले जेव्हा मज आशय स्वप्नांचे 

कळू लागले, सरले आहे वय स्वप्नांचे 



कुठून आणू धुंदी आता तरुणपणाची? 


बंद कधीचे पडले मदिरालय स्वप्नांचे 



एक जातसे पूर्णत्वाला, लाख भंगती 


काय करावे मोल अशा मृण्मय स्वप्नांचे? 



निद्रिस्तांच्या दिग्विजयाची दौड रात्रभर 


बळी दिले जातात पहाटे हय स्वप्नांचे 



संकल्पांची होळी होता बांध तोडुनी 


पूर वाहती डोळ्यांतुन जलमय स्वप्नांचे 



प्रखर वास्तवाचा भास्कर माथ्यावर आहे 


मेणाच्या पंखांना वाटे भय स्वप्नांचे 



ऑथेल्लो मी, मीच इयागो, डेस्डिमना ती 


किती अकारण घ्यावे मी संशय स्वप्नांचे 



अमूर्त असते शैली स्वप्नांच्या चित्रांची 


अपूर्ण उरते मनोमनी वाड्.मय स्वप्नांचे

त्या युगाचे स्वप्न बघतो, सत्य जे होणार नाही

वाट त्याची पाहतो जो देव अवतरणार नाही



काय ग्लानी याहुनी बाकी असे धर्मास येणे?


झोपलेला शेषशायी का कधी उठणार नाही?



माजले सत्तांध कौरव, मातले कामांध रावण


लाज दुबळ्यांच्या घरांची राखली जाणार नाही



उंब‍र्‍यावर सांजकाळी पेंगती पाळीव बोके


एकही स्तंभातुनी का गर्जना घुमणार नाही?



'भृंग', वार्‍यावर जगाला सोडले परमेश्वराने


अन्‌ फण्यावर तोलुनी ते शेषही धरणार नाही

अभिमन्यू अन्‌ आकांक्षांचे नाते आहे

दोघांसाठी अमरत्वाचे जाते आहे



भरडायाला काळाने ठेका धरला अन्‌


सटवाई तालावर ओवी गाते आहे



व्याजावर लावू बघणार्‍यांनी सांगावे


माणुसकी का बँकेमधले खाते आहे?



अपयश दैवावर मी इथवर ढकलत होतो


तेही आता संगत सोडुन जाते आहे



घाटावरुनी जिभल्या चाटत पंडित बघती


गंगेमध्ये शव कोणाचे न्हाते आहे



सांगा, नैराश्याला नावे का ठेवू मी?


ते तर माझ्या काव्याचे उद्गाते आहे

Newer Posts Older Posts Home