Blogger Template by Blogcrowds.

कधी व्रत लेउनी होतीस तू अन्‌

कधी मी सोवळे नेसून होतो
असे वर्षानुवर्षे नीट आपण
दुराव्याची घडी बसवून होतो

तुझ्या-माझ्या सुखी सहजीवनाची
जगाने पाहिली रेखीव चित्रे
अशा रेखाकृतींनी चित्रदालन
घराला आपल्या बनवून होतो

'इथे शीतल झरा वाहे सुखाचा,
इथे अपुलेपणाची ऊब आहे'
अशा ह्या पुस्तकी प्रतिमांत आपण
कधी उबलो, कधी गोठून होतो

ठराया लागले आहेत अपुले
अताशा वादही कंटाळवाणे
नव्याने काय कुरघोडी करावी,
जुने मुद्दे पुन्हा उकरून होतो

कुणीही येत नाही, जात नाही
मनाच्या उंबर्‍याला पार करुनी
दुतर्फा चेहर्‍यावर स्वागताच्या
कनाती रेशमी उभवून होतो...

मी वेचले सुखाचे क्षण दोन-चार अलबत
मोजून जीवनाने केली वसूल किंमत

बसलेत पाठ करुनी माझ्याकडे किनारे
भवसागरात कुठवर हे भरकटेल गलबत ?

प्रेमात काय पडलो, मजनू मला ठरवले
नंतर पुढील सारे घडले परंपरागत

तव लग्नमंडपी मी येऊ जरी न शकलो
नाते अपूर्ण अपुले होते बनून रुखवत

मी दोष काय द्यावा बहिर्‍या जगास जेथे
माझ्याच माणसांना कळले कधी न हृद्गत

ही बांधलीस कैसी तू गाठ, ब्रह्मदेवा ?
सारे दिवे जगाचे झाले तमासवे रत

शिक्षा खुशाल मजला देऊन मोकळे व्हा
कसली सुनावणी अन्‌ न्यायालयीन मसलत

मागिल पिढ्या अम्हाला देऊन बाग गेल्या
यावी कशी फुले पण केल्याविना मशागत

कवितारती असो वा संतप्त शब्दपलिता
अंती विझून जाणे हे एक सत्य शाश्वत


हळव्या, प्रतिभ कवीने येथे जपून गावे
मत-पिंक टाकणारे बसलेत शब्द चघळत

Newer Posts Older Posts Home