इतके कुणी कुणाच्या जावे जवळ कशाला
लगटून वार करण्या द्यावेच बळ कशाला
आयुष्य भोगण्याची संधी पुन्हा न येते
ही अर्थ शोधण्याची ढवळाढवळ कशाला
मातीत चाक रुतणे चुकते इथे कुणाला
प्रारब्ध माणसाचे ठरते अटळ कशाला
नीती म्हणून काही उरले न औषधाला
मी अन्यथा कुणावर ओकू गरळ कशाला
उल्केसमान सारे खातात रोज माती
मी एकटाच येथे राहू अढळ कशाला
कोणी म्हणोत काही, बसणार स्वस्थ आता
आकाश फाटल्यावर लावू ठिगळ कशाला
सांगेन अर्जुनाला उपयुक्त चार गोष्टी
समरी, मिलिंद, मिथ्या बोलू बरळ कशाला
Labels: ghazal, Marathi ghazal, गझल, मराठी गझल
1 Comment:
Subscribe to:
Post Comments (Atom)
मी एकटाच येथे राहू अढळ कशाला
ya 2 oli khupach chan watlya...9420952573