धर्म नाही, जात नाही, गोत नाही
भेट असल्यांशी कधी का होत नाही ?
घट्ट रोवावे मुळांना भावनांच्या
प्रेम झंझावात आहे, झोत नाही
एकदा ठरवून टाकावे सखीने
"ना" नसावी, मात्र छाती "हो"त नाही
स्पर्श मागे रेशमी होवून गेले
नेसल्या वस्त्रास तसला पोत नाही
स्वागताला ज्या शिव्या देतोस, मित्रा
तो जिव्हाळा "यो"त नाही, "ब्रो"त नाही
हात कानांवर जगाने ठेवले अन्
शोषितांचे चित्तही टाहोत नाही
काजव्याची काजवीला खूण आहे
ती दिव्याची मार्गदर्शक ज्योत नाही
केवढी विक्षिप्त आहे लोकशाही
तोंडपाटिल खूप, कोणी खोत नाही
Labels: ghazal, Marathi ghazal, गझल, मराठी गझल
नाही कुणी कुणाशी बोलावयास राजी
प्रत्येक मावळ्याचा झाला म्हणे शिवाजी
दिसतात खूप सारे श्रीराम आणि बाजी
दुर्मीळ मात्र झाले सौमित्र अन् चिमाजी
झटपट तलाक घ्यावा, मग सोयरीक ताजी
थैल्या करा रिकाम्या, मिळतील कैक काजी
अपुल्याच माणसांवर त्वेषात वार करती
परकीय बेगमांना मुजरा, सलाम, हा जी
दुर्दैव, माणसांची पारख तुम्हास नव्हती
केलात, शंभुराजे, कैसा जवळ जिवाजी?
जाता समीप उंची उमजेल जीवघेणी
लांबून खूप सुंदर वाटेल शैलराजी
त्याचीच आकृती ही मोहक, खुणावणारी
वाटे, हरून नेण्या, आला सखा यमाजी
Labels: ghazal, Marathi ghazal, गझल, मराठी गझल
Subscribe to:
Posts (Atom)

