थांब जराशी, चंद्र नभी मावळला नाही
प्राजक्ताने श्वेत सडा अंथरला नाही...
कुठे संपला झिम्मा ताऱ्यांचा आकाशी ?
रंग उषेने व्योमावर शिंपडला नाही...
रातकिड्यांनी कुठे छेडली, सखे, भैरवी ?
सूर विहंगांचा कानावर पडला नाही...
निशिगंधाचा अजून येतो मादक दरवळ
गुलाब, जाई, जुई, मोगरा फुलला नाही...
अजून जागा झाला नाही पहाटवारा
दवस्पर्शाने देह कळीचा खुलला नाही...
किती बोललो डोळ्यांनी, ओठां-स्पर्शांनी
शब्द निरोपाचा काही सापडला नाही...
Labels: कविता, प्रेमकाव्य
मी डाव टाकला की तू फेकलेस जाळे ?
खेळात उभयतांची जिंकून मात झाली
आयुष्यरखरखाटा आच्छादलेस ऐसे
मध्यान्हिच्या उन्हाची पौर्णीम रात झाली
खुलली सुवर्णकांती अजुनी मदालसेची
हळदीत नाहली अन् सिंदूरस्नात झाली
जाता जवळ जरासा, रोमांचली नवोढा
धडधड अधीर, नूतन नवख्या उरात झाली
हाकी अरूण निर्दय वेगात रथ असा का
आरूढ ज्यावरी ही अरसिक प्रभात झाली ?
फुलुनी खुणावणारी होती फुलंही दोषी
अपकीर्ति पण अलीची रानावनात झाली
करता मिलिंद गुंजन अलगद मधास लुटतो
कुजबुज अशी फुलांची आपापसात झाली
Labels: कविता, गझल, प्रेमकाव्य
