श्री. हरिवंशराय 'बच्चन' ह्यांच्या 'मधुकलश' कवितासंग्रहातील 'कवि की निराशा' ह्या कवितेचा अनुवाद
१.
धीर धरुनी संकटीही आपणा सांभाळले मी,
मात्र पडणे पर्वताचे मी शिरी साहू न शकलो,
भार होता जीवनाचा, अधरी प्याला लावला मी;
करुनि रात्रंदिवस निंदा थकवली जिह्वा जगाने,
व्यर्थ; होते रंजनाचे सबब ते मधुपान माझे !
जग विचारी, का असे नैराश्यभरले गान माझे ?
अन् नभीचा वाढणारा चंद्र पुन्हा क्षीण होतो,
क्षीण अन् होऊन पुरता म्लान, मग द्युतिमान होतो,
गोंधळुन चक्रात ह्या आजन्म मी तल्लीन होतो;
साजरा करू विजय कुठला, दुःख पाडावात कुठल्या ?
रात-दिन-सम जड क्रमाने बद्ध पतनोत्थान माझे
जग विचारी, का असे नैराश्यभरले गान माझे ?
बहरलेल्या उपवनी शिशिरातला वायू न येवो,
कोकिळा सकरुण स्वरांनी सोडुनी ना वृक्ष जावो,
जे युगांचे स्वप्न कविचे ते कधी खोटे न होवो
हे न झाले तर सुखांचे कोणत्या मी गीत गावे ?
मागणे कुठले जगाने पूर्ण केले सान माझे ?
जग विचारी, का असे नैराश्यभरले गान माझे ?
चांगले, वाईट ह्यांची छापही माझ्यात आहे,
अपयशी केवळ मला ठरवून जग अन्याय करते,
साथिने माझ्यात दोषांच्या गुणांचे माप आहे
मी जगा अभिशाप आहे, अन् जगा वरदानही मी;
शाप साऱ्यांना दिसे पण छन्न हे वरदान माझे !
जग विचारी, का असे नैराश्यभरले गान माझे ?
करत थट्टा मी लयाची विसरलो नाही स्वतःला
देउनी आशीष स्वर्गा झुकवतो शिर भूमिपुढती !
उसळुनी सिंधू-उरी आमोद जैसा बुडबुड्याला;
एक माझ्या लघु पदाने मोजले वैभव धरेचे !
दीन जग करणार कैसे, सांग ना, सन्मान माझे ?
जग विचारी, का असे नैराश्यभरले गान माझे ?
राहिली संदेह-शंकांचीच वस्ती येथ आता,
वाट कोणी दाखवावी, सर्व अन् पथभ्रष्ट येथे,
केव्हढा गोंगाट, "मत माझे बरोबर" सर्व म्हणता
हर दिशेने जाउनी मागे फिरे, मग धाव घेई;
ध्येय कोठे, ओळखू शकले न जीवन- यान माझे !
जग विचारी, का असे नैराश्यभरले गान माझे ?
ह्या करी जीवन-सुधा-रस अन् करी दुसऱ्या हलाहल,
ऐकतो नंदनपरीचे गान, क्रंदन भिक्षुणीचे,
घन तमाच्या पाहतो मांडीवरी मी ज्योत निर्मल;
आस, मग नैराश्य, अन् मग शून्यसे हृदयात काही,
कण-समूहांनी विरोधी जाहले निर्माण माझे
जग विचारी, का असे नैराश्यभरले गान माझे ?
नयन झुकवुन लिहित होती एक पुस्तक ती उदारा,
"ही कथा आहे तुझी" सांगून मज पुस्तक दिले ते
पान पहिले उघडले अन् कंपला मम देह सारा,
'भूमिका' वाचून रडलो मी गगन-स्वप्नाभिलाषी,
दोन अध्यायात 'सांप्रत' पूर्ण लघु आख्यान माझे !
जग विचारी, का असे नैराश्यभरले गान माझे ?
आजही सव्याज मुद्दल घेत आहे काळ मोजुन,
व्याज म्हणुनी वसुल केले गान हृदयाचे तयाने,
पण दिवस उरलेत केवळ दोन फिटण्या कर्ज सारे,
होउनी निश्चिंत मग पहुडेन मी ओढून चादर
विसरुनी केले जगाने कैक जे अपमान माझे
जग विचारी, का असे नैराश्यभरले गान माझे ?
का वनी काट्यांत फिरलो पथ फुलांचा सोडुनी मी ?
हास्य विद्युत हटवुनी का अश्रु-धारांतुन बरसलो ?
का सुधेने न्हात असता गरळ पीण्या चाललो मी ?
उकलुनी कोडे जरी हे जग मला समजेल थोडे
होउनी जाईल त्यापूर्वीच पण अवसान माझे !
जग विचारी, का असे नैराश्यभरले गान माझे ?
Labels: Madhukalash translation, भाषांतर, मधुकलश
काय मी सांगू तुला, केव्हा उचलली लेखणी
तू तिथे फुललीस अन् येथे बहरली लेखणी
पाहिले गजगामिनीसम चालता जेव्हा तुला
त्या दिसापासून लिहिताना ठुमकली लेखणी
पाहिले नव्हते तुला, झुंजार होती तोवरी
पाहता तुज काव्यपंक्तींने निथळली लेखणी
काव्य गुजगोष्टीत आहे, काव्य आहे मीलनी
आजवर मी कागदावर का झिजवली लेखणी?
कोडकौतुक संयमाचे मी तिच्या केले खरे
सोबतीने, हाय, पायाच्या घसरली लेखणी
------------------------------------------------------------------------------------
'पिंड गाण्याचा नसे माझा', गरजली लेखणी
शस्त्र हाती घेतल्यागत मी परजली लेखणी
काय ताळू, काय कागद, माणसा संयम कुठे ?
जीभ कोणी उचलली, कोणी उचलली लेखणी !
काय अन् सांगू किती, होते असे कायम तिला
मोजक्या शब्दांत बोलाया न शिकली लेखणी
सांगते तोंडावरी राजासही, "तू नागवा"
ती खरी निर्भीड बाण्याची निपजली लेखणी
लादले निर्बंध त्यांची पेटली सिंहासने
दहशतीच्या प्राणवायूने भडकली लेखणी
छाटल्या जेव्हा जिभा, कैदेत लाखो टाकले
आग झाली, घन तमी पेटून उठली लेखणी
ऐकले नाही कुणाचे, थांबली नाही कधी
हाक आली दूरची तेव्हाच मिटली लेखणी...
मान्य, गर्दी फार येथे अन् तिथे विश्राम आहे
मुक्तिच्या वाटेवरीही हाच ट्रॅफिक जाम आहे
वाट जग ह्याचीच बघतय, मी कधी कोषात जातो
रेशमाचा भाव हल्ली वाढला बेफाम आहे
खूपसे हितशत्रू आणिक वानवा नाही रिपुंची
का तरी माझा स्वत:शी चालला संग्राम आहे?
लक्तरे लेऊन अंगी धाडले होते लढाया
अंत्ययात्रेला परंतू केव्हढा इतमाम आहे
चार खांदे शोधण्यासाठी निघाले प्रेत माझे
बोलले, " नाहीतरी मज काय दुसरे काम आहे? "
मूर्तिपूजेचा 'गुन्हा' चुकला कुणा; सारेच काफिर
पूजती काबा कुणी, कोणास शालिग्राम आहे
उडवुनी घेऊन गेला शब्दपाचोळ्यास वारा
राहिले निष्पर्ण मागे मूक अंतर्याम आहे...
श्री.हरिवंशराय 'बच्चन' ह्यांच्या 'मधुकलश' कवितासंग्रहातील 'कवि की वासना' ह्या कवितेचा अनुवाद.
१.
सृष्टिप्रारंभी उषेचे गाल होते चुंबिले मी,
बाल रविच्या भाग्यशाली दीप्त भाळा चुंबिले मी,
प्रथम संध्येचे अरुण मी चुंबुनी डोळे निजविले,
तारकामंडित निशेच्या कुंतलांना चुंबिले मी,
वायुचे रसमय अधर स्पर्शायचे अधरांस पूर्वी
मृत्तिकेच्या आज मूर्तींशी कसे अभिसार माझे !
जग म्हणे की वासनामय होत हे उद्गार माझे !
२.
विगत-बाल्य वसुंधरेचे तुंग स्तन उन्नत उभरले,
हरित भूमीतिल तरूंना धरुन मन्मथ-ध्वज फडकले,
चपल उच्छृंखल करांनी त्या दिनी उत्पात केला,
तो असे तळहाति लिहिला, वाचुनी जरि विश्व हलले;
सागराला प्राशुनीही राहिलो अतृप्त आहे,
कामिनीच्या कुच-घड्याशी आज का शृंगार माझे !
जग म्हणे की वासनामय होत हे उद्गार माझे !
३.
इंद्रधनुवर ठेवुनी शिर, मेघ करुनी शेज सुखकर
झोपलो मनसोक्त होतो बाहुपाशी चंचला धर,
दीप, रवि-शशि-तारकांनी पाहिली ती बाह्य क्रीडा,
पाहु ना शकला कुणीही स्वप्न ती सुकुमार सुन्दर
ठेवुनी हळुवार गेली यामिनी जी पापण्यांवर;
ही असे बनली समाधी, हे न शयनागार माझे !
जग म्हणे की वासनामय होत हे उद्गार माझे !
४.
आज माती वेढते मज पण जुना उत्साह आहे,
सोमरस जो प्राशिणारा, आज पाणी हाति आहे,
ओठ पेल्याजवळ गेले पण विवश ह्या कारणाने,
व्रत तहानेचे धरोनी बैसले मन स्वाभिमानी;
बांधलो नाही, जगा, मी देहधर्मांने, उमज तू,
जाहले विकृत जरी तन मन सदा अविकार माझे !
जग म्हणे की वासनामय होत हे उद्गार माझे !
५.
लीलया सोडून ज्यांना भुलवतो सार्या जनांना,
असुर, मानव अन् सुरांना, वृद्ध ब्रह्मा, विष्णु, हरांना,
भंग तो करतो तपस्या सिद्ध, ऋषि, मुनि, सत्तमांची
ते फुलांचे बाण दिधले मीच पंचशरास होते;
शक्ति माझ्याजवळ थोडी ठेवली हे दान देता,
तेच मारुन करु पहातो आज मन बेजार माझे !
जग म्हणे की वासनामय होत हे उद्गार माझे !
६.
दोन प्राणांची घडावी भेट कैसी, भिंत हे तन
काळ ना मोजीत घटका, शृंखलांचा शब्द झन-झन,
वेद अन् जनरीत प्रहरी पाळतीवर नित्य माझ्या,
बद्ध असल्या बंधनांनी काय आशा करिल यौवन !
छोटिशी इच्छाहि माझी अडकुनी कैदेत पडली,
विश्व क्रीडांगण नसे हे, विश्व कारागार माझे !
जग म्हणे की वासनामय होत हे उद्गार माझे !
७.
शीत पाण्याची तृषा असता निखारे सेवले मी,
आणि चिंध्यांनी स्वत:ला त्या दिनी शृंगारले मी
वेष राजस घालण्याची प्रबळ इच्छा झालि जेव्हा,
संग्रहित करण्यास इच्छा खर्चले भांडार माझे;
वासना अत्युच्च असतानाच बनलो संयमी मी,
अन् क्षुधारूपात कायम सर्व ते आहार माझे !
जग म्हणे की वासनामय होत हे उद्गार माझे !
८.
काल अथ अन् इति उद्या ही प्रीतिची माझ्या कहाणी,
कोण मी, मागे उरावी का जगी माझी निशाणी ?
काय मी केले जगाने जे न यापूर्वीच केले ?
का खले जर्जर जगाला मम क्षणिक यौवन-तराणी ?
लपवणे जमते मला तर जग मला साधू समजते,
शत्रु माझे, हाय, बनले, निष्कपट व्यवहार माझे !
जग म्हणे की वासनामय होत हे उद्गार माझे !
