२६ जुलै २००५ ला आभाळ फाटले. मुंबई शहर कमी व जलाशय अधिक भासू लागली. एका महानगरात काही तासांच्या पावसाने १०००च्या आसपास बळी घेतले. नाही, चुकलो. बळी पावसाने नाही, वर्षानुवर्षे झोपा काढणाऱ्या, सामान्य नागरिकांच्या सुखदु:खाशी काहीही देणेघेणे नसलेल्या राजकारण्यांनी आणि नोकरशहांनी घेतला. खापर मात्र पावसावर फुटलं. त्या दिवसाच्या अनुभवातून स्फुरलेल्या ह्या काही ओळी.
निष्चेष्ट पडलेली धरा
विवस्त्र, विटंबित देहावर ओढून
आकाशकाळोखीची चादर
एके काळच्या उन्मत्त, बेफाम सरिता
बुजवल्या, बुजल्या, बुजऱ्या झाल्या
निपचित पडून आपल्यात सामावत गेल्या
गाळ माणसांचा
दलदलीच्या खोल मांड्यांमध्ये उभी राहिली
एक नवी मयसभा
बिचाऱ्या मिठीला जिने
आपल्या मगरमिठीत आवळून टाकले
आक्रोश करू लागले आकाश
बलात्कारित सखीची पाहून अवस्था
व्योमाचे काळेभोर डोळे वाहू लागले
वाहत राहिले...
Labels: कविता
द्युतामध्ये रमलो नाही
शकुनी होऊ शकलो नाही
फासे फिरले, वासे फिरले
पडझड झाली, खचलो नाही
हाती उरल्या जीवन-निष्ठा
एक तेव्हढे हरलो नाही
काट्यांनो या सोबत माझ्या
दोस्त जुने विस्मरलो नाही
लुकलुकता मी क्षीण काजवा
मार्तंडांना रुचलो नाही
आतुर माती सुजला, सुफला
मीच करंटा रुजलो नाही
कशी कुणाची सेवा घेऊ
चंदन होऊन झिजलो नाही
पाय घसरले भल्याभल्यांचे
मीच एकटा चळलो नाही
काय घाबरू यमदूताला
जगण्याला जर डरलो नाही
काय तुम्हाला ओळख देऊ
मलाच मी जर कळलो नाही
Labels: गझल
Subscribe to:
Posts (Atom)
